महाराष्ट्र सामाजिक

*1 जानेवारीला नव्हे,तर भारतीय संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नववर्षारंभ साजरा करा* !

 

 

भारतीय तरुणांवर पाश्चात्त्यांचा पगडा !

 

‘भारत देश जसा आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे, तसतसा भारतियांवर पाश्चिमात्त्यांचा पगडा वाढत चालला आहे. पूर्वी शाळा-महाविद्यालयांमध्ये हळदी-कुंकू समारंभ साजरे व्हायचे. समाज आणि राष्ट्र यांसाठी आपले जीवन वाहून घेतलेले समाजसुधारक, क्रांतीकारक यांच्या जयंती, पुण्यतिथी साजर्‍या व्हायच्या. सध्या मात्र ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘रोज डे’, ‘रीबीन डे’, ‘सारी डे’, ‘फ्रेंडशीप डे’ साजरे होतात. महाविद्यालयांच्या उपहारगृहांतील उसळ-मिसळची जागा आता महागड्या ‘पिझ्झा-बर्गर’ने घेतली आहे. 80 टक्क्यांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थीनी ‘जीन्स’, ‘टी-शर्ट’ यांसारख्या पुरुषी वेशांत महाविद्यालयांत विद्येचे धडे घेतांना दिसतात. पूर्वी चित्रपटांतही क्वचितच दिसणार्‍या ‘मिडी-मिनी’वेषातील मुली आज प्रत्येक महाविद्यालयाच्या आवारात वावरतांना दिसतात. मुंबईतील एका संस्थेने केलेल्या चाचणीनुसार सध्याच्या बहुसंख्य मुलींचे कौमार्य वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षीच भंग होते. पुरोगामित्त्वाच्या नावावर पाश्चात्त्यांचे अंधानुकरण केल्याने युवापिढीचा असा र्‍हास होत चालला आहे. आजची युवापिढी केवळ पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करून त्यांचे लांगूलचालन करण्यातच आपली धन्यता मानू लागल्याने आपली मूळ हिंदु संस्कृती हरवत चालली आहे. परिणामी आजची युवापिढी दिशाहीन आणि ध्येयहीन झाली आहे. संस्कृतीला अनुरूप कृती करणे, हे आजच्या पिढीला लज्जास्पद वाटते. पाश्चात्त्यांच्या पावलांवर पावले टाकून आज आपणसुद्धा (हिंदू) 1 जानेवारी हा आपला वर्षारंभ मानून आदल्या रात्री नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

भारतीय संस्कृतीचे महत्त्व

भारतीय संस्कृती ही सर्वांत प्राचीन आणि महान संस्कृती आहे. प्राणिमात्राच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचे आचरण कसे असावे ? आणि आपल्या जन्माचे सार्थक कसे करावे ? हे आपल्या ऋषीमुनींनी वेद उपनिषदांमध्ये लिहून ठेवले आहे. त्याचे पालन करून आज कित्येकांनी आपल्या आयुष्याचे ध्येय साध्य केले आहे. भारतीय संस्कृतीचे आकर्षण आज पाश्चिमात्त्यांनाही आहे. भोगवादी संस्कृतीने ग्रासल्यामुळे ते भारतीय धर्मग्रंथांत चिरंतन सुखाचा शोध घेत आहेत. साधना करून स्वतःचे कल्याण करून घेत आहेत. आपला तरुणवर्ग मात्र पाश्चिमात्यांच्या भोगवादाला बळी पडून स्वतःच आयुष्याची राख-रांगोळी करायला निघाला आहे. क्षणिक सुखासाठी आपले भविष्य पुसण्यासाठी निघाला आहे.

1 जानेवारी हा ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ

1 जानेवारी खरेतर ख्रिस्ती नववर्षाचा आरंभ आहे. आजमितीला जगभरात ख्रिस्ती राष्ट्रे बहुसंख्य असल्याने आणि या राष्ट्रांनी जगातील बहुसंख्य देशांवर आपले अधिपत्य गाजवल्याने तेथील संस्कृतीचा पगडा जगभर पहायला मिळतो. त्यामुळे ‘1 जानेवारी हे जागतिक नववर्ष आहे’, असा अपसमज निर्माण झाला आहे; परंतु जगाच्या आराखड्यावर (नकाशावर) आज अशी अनेक राष्ट्रे आहेत, जी या पाश्चात्त्य संस्कृतीला झुगारून स्वराष्ट्राची संस्कृती जतन करून आहेत. त्यांचे नववर्ष 1 जानेवारीला चालू होत नाही. भारतीय संस्कृती तर या सर्वांहून प्राचीन संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीनुसार नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्याच्या दिवशी होतो. पृथ्वीच्या निर्मितीचा दिवसही हाच आहे. त्यामुळे समस्त भारतियांनी नववर्षाचा आरंभ गुढीपाडव्यापासून करायला हवा; परंतु देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही काही गोष्टीत आपण इंग्रजांच्या पारतंत्र्याचा त्याग केलेला नाही. त्यातील हा एक प्रकार आहे. आपल्याला आपल्या महान अशा संस्कृतीचा विसर पडत चालला आहे.

निधर्मी शासनाने हिंदु धर्म धुडकावून लावून वैश्विक शक्तींशी आणि

येथील मातीशी मुळीच संबंध नसलेले हिंदूंवर लादलेले दिवस पालटले पाहिजेत !

हिंदु धर्म अनादी असल्यामुळे त्याचा प्रत्येक गोष्टीत अनादी ईश्वराच्या विविध रूपांशी संबंध असतो, उदा. विश्वात श्री गणेशतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा ज्ञानदायी आणि विघ्नहर्ता श्री गणेशचतुर्थी; शक्तीतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा नवरात्र; ज्ञान, भक्ती आणि वैराग्यदायी शिवतत्त्व जास्त प्रमाणात असते, तेव्हा शिवरात्र असते. याउलट इतर पंथियांतील महत्त्वाचे दिवस पृथ्वीवर होऊन गेलेल्या घटनांशी संबंधित आहेत. पुढील काही उदाहरणांवरून हिंदु धर्माची महानता आणि भारतियांची ‘इंग्रजांची मानसिक गुलामगिरी’ अन् विचारांचा क्षुद्रपणा लक्षात येईल.

अ. भारतीय संस्कृतीवर आधारित ‘शालिवाहन शक’ इत्यादी शक वर्षगणनेसाठी न मानता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून काळाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसलेले ‘इ.स.’ ही पद्धत वर्षगणनेसाठी पाळायला आरंभ केला.

आ. पाडव्याला निर्मितीशी संबंधित प्रजापतिलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो वर्षारंभाचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून 1 जानेवारी हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस वर्षारंभाचा दिवस म्हणून पाळायला आरंभ केला.

 

ई. लष्करातील जवानांचा दिवस विजयादशमीला साजरा केला असता, तर ते योग्य झाले असते.

उ. धनत्रयोदशी हा दिवस आरोग्याची देवता ‘धन्वंतरी’ हिचा दिवस म्हणून पाळण्याऐवजी पाश्चात्त्यांचा ‘जागतिक आरोग्यदिन’ मानसिक गुलामगिरीतून स्वीकारला.

ऊ. श्री लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री लक्ष्मीलहरी पृथ्वीवर सर्वांत जास्त प्रमाणात येत असतांना तो आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून न पाळता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून 1 एप्रिल हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस आर्थिक वर्षाच्या आरंभीचा दिवस म्हणून पाळायला आरंभ केला.

ए. आठवड्याचा सुटीचा दिवस म्हणून भारतीय संस्कृतीतील सर्वांत महत्त्वाचे तत्त्व म्हणजे गुरुतत्त्व त्याची उपासना करण्यासाठी ‘गुरुवार’ हा दिवस न ठेवता इंग्रजांची मानसिक गुलामगिरी म्हणून ‘रविवार’ हा कोणत्याही तत्त्वावर आधारित नसलेला दिवस निवडला.

भारतीय संस्कृती किती महान आहे हे यावरून अनुभवता येते.भारतीय संस्कृतीनुसार दिवसांचे महत्व आत्मसात करून त्याप्रमाणे कृती करण्याचा निर्धार करूयात आणि इतरांना पण यानुसार कृती करण्यास सांगुयात आणि यातील चैतन्यपण अनभवूया.

संकलक : सौ.सुनीता खाडे

सौजन्य – सनातन संस्था.

संपर्क क्रमांक ९९७०७५२५०७

Copyright ©