महाराष्ट्र सामाजिक

कॅनडाचा हात, खलिस्तानी आतंकवाद्यांना साथ’ कॅनडा हा आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे ! – रवीरंजन सिंह

कॅनडाचा हात, खलिस्तानी आतंकवाद्यांना साथ’कॅनडा हा आतंकवाद्यांचा अड्डा बनला आहे ! – रवीरंजन सिंह

कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांचे वडिल कॅनडाचे पंतप्रधान असतांना खलिस्तानची मागणी करणार्‍या तलविंदर सिंह परमार या आतंकवाद्याने विमानात बाँबस्फोट करून शेकडो शिखांना मारले होते. तत्पूर्वी शीख प्रवासी जहाज ‘कामागाटामारू’ याला कॅनडामध्ये प्रवेश नाकारून त्यावर गोळीबार करण्यात आला. हा कॅनडाचा शीख प्रेमाचा इतिहास आहे. कॅनडा हा आतंकवाद्याचे समर्थन करणारा देश नव्हे, तर आतंकवाद्यांच्या अड्डा बनला आहे, असे रोखठोक प्रतिपादन ‘झटका सर्टिफिकेशन अथॉरिटी’ अध्यक्ष श्री. रवीरंजन सिंह यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘कॅनेडाचा हात, खलिस्तानी आतंकवाद्यांना साथ’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते.

या वेळी श्री. रवीरंजन सिंह पुढे म्हणाले की, कॅनडा निज्जर याच्या हत्येचा निखालस खोटा आरोप भारतावर करत असून या आरोपामागे पाकिस्तानचे षड्यंत्र आहे. अन्य देशाच्या सीमेत जाऊन देशद्रोह्यांना ठार करण्याचा आपला कायदा नाही. आणि कोणी अधिकारी आपली नोकरी धोक्यात घालून असे कृत्य करणार नाही. खलिस्तान हा असा आजार आहे ज्याच्यावर अनेक डॉक्टर उपचार करत आहेत; पण जोपर्यंत पाकिस्तान नेस्तनाबूत केले जात नाही तोपर्यंत ही समस्या नष्ट होणार नाही. आक्रमण हाच बचावाचा मार्ग आहे. भारतात शिखांच्या काही समस्या आहेत; पण त्याला खलिस्तानशी जोडू नये. त्या समस्या सनदशीर मार्गाने मांडाव्यात. त्यासाठी शत्रू राष्ट्रांशी मिळून देशविरोधी कारवाया करणे केव्हाही चूक आहे. हिंदू आणि शीख बांधव आहेत. या दोघांना विलग करणे ही पाकिस्तानच्या आय.एस्.आय.ची राजकीय खेळी आहे. शिखांचे 4 तख्त असतांना 1960 मध्ये पाचवे तख्त निर्माण करणे हा याच षड्यंत्राचा भाग आहे. तसेच गुरुपतवंत सिंह पन्नू हा शीख धर्माचे पालन करत नाही. त्यामुळे त्याला शिखांचे नेतृत्व करण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही त्यांनी सांगितले.

या वेळी ‘रणरागिणी’ या हिंदु जनजागृती समितीच्या महिला शाखेच्या सौ. संदीप मुंजाल म्हणाल्या की, कॅनडाच्या गुरुद्वाराबाहेर आजही निज्जर समर्थनाचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत. तेथे भारताच्या राजनैतिक अधिकार्‍यांचे छायाचित्रे लावून त्यांच्या हत्येला उद्युक्त केले जात आहे. खलिस्तानी आतंकवाद्यांनी तेथील लक्ष्मीनारायण मंदिरावर हल्ला केल्याप्रकरणी कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. ‘करीमा बलोच’ या प्रभावशाली महिलेच्या हत्यानंतरही कॅनेडाने कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे कॅनडा सरकार हे पूर्णतः खलिस्तानी आतंकवाद्यांच्या बाजूने असल्याचे दिसते. कॅनडामध्ये भारतातून शिकण्यासाठी जाणार्‍या मुलांवर भारतीय पालक 8 अब्ज डॉलर्स खर्च करतात; मात्र ज्या देशाचे धोरण भारतविरोधी आहे. अशा देशात मुलांना भारतविरोधीच शिकवले जाणार याचा विचार आता पालकांनी करणे आवश्यक आहे, असेही सौ. मुंजाल शेवटी म्हणाल्या.

Copyright ©