यवतमाळ सामाजिक

विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे – डॉ.पंकज आशिया

विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे – डॉ.पंकज आशिया

इतर बातम्या सह.

पिकविमा योजना तक्रार निवारण समितीचा आढावा

नुकसान सर्वेक्षणासाठी पैसे मागितल्यास तक्रार नोंदवा

जिल्ह्यात 94 हजार नुकसानग्रस्तांचे सर्वेक्षण पुर्ण

यवतमाळ, दि.१ : प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगामातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा तक्रार निवारण समीतीची सभा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या योजनेंतर्गत प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

जिल्ह्यात ३ लाख ६७ हजार शेतकऱ्यांनी ८ लाख ४५ हजार पिक विमा अर्ज दाखल केले आहे. या योजनेंतर्गत पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुरक्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट इत्यादी कारणाने होणाऱ्या पिक नुकसानीच्या पुर्व सुचना ह्या ७२ तासाच्या आत विमा काढलेल्या शेतकऱ्याने दाखल करणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात जुलैमध्ये अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांकडून १ लाख ३४ हजार पुर्व सुचना प्राप्त झाल्या आहे, त्यापैकी ९४ हजार ५७१ शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण झाले आहे. उर्वरित पंचनामे पुढील पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना रिलायन्स जनरल विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी दिल्या.

पिक विमा कंपनीच्या प्रतिनीधींकडून नुकसानीच्या सर्वेक्षणसाठी पीक नुकसान पर्यवेक्षकाकडून शेतकऱ्यांची अडवणूक करुन पैशाची मागणी होत असल्याबाबत तक्रारी आहे. त्यानुषंगाने नुकसानीच्या सर्वेक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या नुकसान पर्यवेक्षकाला कुठलाही आर्थिक व्यवहार करु नये. तसेच कोणत्याही प्रलोभणास बळी पडू नये. नुकसान पर्यवेक्षकाडून अडवणूक झाल्यास किंवा पैशाची मागणी झाल्यास विमा कंपनीच्या १८००-१०२-४०८८ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी खरीप हंगामातील पिक विमा योजनेतील प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला. भारतीय कृषि विमा कंपणीकडून १०० टक्के नुकसान होऊन देखील बऱ्याच शेतकऱ्यांना ३३ टक्के प्रमाणे नुकसान दाखवून विमा भरपाई रक्कम दिली गेल्याची बाब वारंवार कंपणीला कळवून देखील कंपनीने कारवाई केली नाही. तसेच ज्या शेतकऱ्यांचे बॅकेचे अकाऊंट नंबर किंवा आयएफएससी क्रमांक चुकला आहे, अशा ४ हजार २८८ शेतकऱ्यांची विमा रक्कम तातडीने अदा करण्याबाबत भारतीय कृषी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला बैठकीत सूचना देण्यात आल्या.

दिव्यांगानी शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ कार्यक्रम २९ सप्टेंबरला ;

शिधापत्रिकांचे होणार वितरण

यवतमाळ, दि.१ : जिल्ह्यातील ज्या पात्र दिव्यांग व्यक्तींकडे अद्यापही शिधापत्रिका नाही किंवा त्यांना अनुज्ञेय लाभ मिळाला नसलेल्या दिव्यांगांनी शिधापत्रिकेसाठी विहित नमुन्यातील अर्ज तहसील कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने केले आहे.

दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी या अभियानाच्या अनुषंगाने पुरवठा विभागांतर्गत दिव्यांगाना देण्यात येणारे लाभ अभियान राबवून देण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत व या अभियानाचे आयोजन २९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत दिव्यांगांना शिधापत्रिकांचे वितरण केले जाणार असून पात्र दिव्यांगांनी शिधापत्रिकेसाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाळू उत्खनन, वाहतूकीच्या ई-निविदा प्रकियेस ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

यवतमाळ, दि १ (जिमाका) : पुसद तालुक्यातील वडसद येथील पुरपरिस्थिती निर्माण होणाऱ्या नदीपात्रातील स्थळातून गाळ व गाळमिश्रीत वाळू उत्खनन करुन डेपोपर्यंत वाहतूक करणे व डेपो निर्मीती तसेच व्यवस्थापनाकरिता ई-निविदा काढण्यात आली होती. या कामासाठी तीन किंवा त्यापेक्षा जास्त निविदा प्राप्त न झाल्याने या ई-निविदा प्रकियेला ७ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या ई-निविदा प्रक्रियेत इच्छुक कंत्राटदारांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ई-निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे. ई-निविदा फॉर्म रक्कम ७ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेपर्यंत जमा करता येईल. तसेच ई-निविदा स्विकारण्यात येतील. कंत्राटदारांना ई-निविदा प्रक्रियेत भाग घेण्याकरिता https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी विहित मुदतीत करणे आवश्यक राहील, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Copyright ©