महाराष्ट्र सामाजिक

अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कागदपत्राची पुर्तता करण्याचे आवाहन

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- पंकज तडस

अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना कागदपत्राची पुर्तता करण्याचे आवाहन

राज्य शासनाने नुकतीच शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांनी कागदपत्राची पुर्तता करण्याचे आवाहन सेलू तहसिलदारांनी केले आहे.

राज्यातील 14 जिल्ह्यामध्ये अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरु करण्यात आली असून यामध्ये वर्धा जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थी योजनेचे आहेत, अशा शिधापत्रिकाधारकांनी संबंधित रास्तभाव दुकानदारांकडे जाऊन डीबीटीसाठी आवश्यक असलेला बँक खात्याचा अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन विवरणपत्र भरुण द्यावे.

एपीएल (केसरी) शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकेमधील लाभार्थी मय्यत असेल अशा लाभार्थ्यांची नावे रास्तभाव दुकानदारांशी संपर्क साधून मय्यम लाभार्थ्यांच्या नावाची यादी तहसिल कार्यालय सेलू येथे सादर करावी. योजनेंतर्गत वितरीत करावयाची रोख रक्कम महिला कुटूंबप्रमुखांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याने महिला कुटूंब प्रमुखाचे खाते नसल्यास सदर महिलेनी बँक खाते सुरु करावे. अपवादात्मक परिस्थितीत तहसिलदार यांच्या मान्यतेने कुटूंबातील इतर सदस्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येईल.

सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकरी लाभार्थी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्याचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीशी संलग्न असणे आवश्यक आहे. म्हणजेच आधार संलग्न असलेल्या लाभार्थ्यांनाच डीबीटी योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. एखाद्या सदस्यांकडे आधार क्रमांक नसल्यास त्यास आधारकार्ड तयार करण्याच्या प्रक्रियेबाबत तहसिल कार्यालय सेलू येथे मार्गदर्शन करण्यात येईल, असेचे सेलू तहसिलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

Copyright ©