यवतमाळ सामाजिक

उठ भगिनी जागी हो, चंडी दुर्गा गार्गी हो ।

उठ भगिनी जागी हो, चंडी दुर्गा गार्गी हो ।

भगीनींनो स्वतःमधील क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हा !

प्रस्तावना : ८ मार्च हा दिवस जागतिक महिलादिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत अनेक विद्वान, पराक्रमी, कुशल महिला होऊन गेल्या. वैमानिक,डॉक्टर,इंजीनिअर,अंतराळवीर अश्या सर्वच क्षेत्रात स्त्रियांनी आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. एवढेच नाहीतर देशाचे पंतप्रधानपद आणि राष्ट्रपतीपद सुद्धा स्त्रियांनी भूषविले आहे.त्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. मात्र आज देशाच्या परिस्थितीचा विचार केला, तर महिला असुरक्षित आहेत. ज्या देशात एका महिलेच्या शीलरक्षणाच्या सूत्रावरून रामायण, महाभारत घडले, त्या देशात आज प्रतिदिन शेकडो महिला अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ‘ऑक्सफेम’ या जागतिक विश्लेषण संस्थेने भारतात प्रत्येक 16 मिनिटाला एका मुलीवर बलात्कार होत असल्याचे म्हटले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावी अनेक हिंदु युवती आज ‘लव्ह जिहाद’ची शिकार होत आहेत. श्रद्धा वालकर, रूपाली चंदनशिवे, निधी गुप्ता, अंकिता सिंह, निकिता तोमर आदी अनेक हिंदु तरुणी याला बळी पडल्या आहेत. सध्या स्त्रिया दुर्बळ झालेल्या असून त्यांच्यामध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी झाली आहे; म्हणून स्त्रियांवरील अत्याचारांत वाढ झालेली आहे. त्यामुळेच स्त्रियांना आज खरी गरज आहे ती प्रखर क्षात्रवृत्तीची ! स्त्रियांनी आपल्यातील क्षात्रवृत्ती जागृत करून केवळ स्वतःच्या नव्हे तर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध झाल्यास कोणाही इक्बाल,आफताबला तिच्याकडे कुदृष्टिने बघण्याचे धाडस होणार नाही. त्याच अनुषंगाने प्रस्तुत लेखात महिलांमधील क्षात्रवृत्ती जागृत करण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता आणि करावयाचे प्रयत्न याविषयी उहापोह करण्यात आला आहे.

 

१. स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता : आजची सामाजिक स्थिती अस्थिर असल्याने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आज दिवसाढवळ्या हत्यासत्र होत आहेत, महिलांवर होणारे बलात्कार, तसेच अत्याचार यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. केवळ भारतात नव्हे, तर जगभर लव्ह जिहादचे षड्यंत्र निर्माण केले गेले आहे, त्याला लाखो तरुणी बळी पडल्या आहेत. वर्ष 2019 च्या एका अहवालानुसार बलात्कार आणि हत्या यांसारखे गुन्हे होण्यात महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. आज सामान्य नागरिकच नव्हे तर ज्यांच्यावर जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे असे पोलीस आणि सैनिक यांच्यावरही समाजकंटक आणि आतंकवादी यांची आक्रमणे चालूच आहेत. घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरी सुरक्षित येईल कि नाही, याची अनेकांना धास्ती असते.

 

२. शिक्षेची कार्यवाही तात्काळ होत नाही : भगवान श्रीकृष्णाची भक्त असलेल्या द्रौपदीवर झालेल्या अत्याचारासाठी १८ अक्षौहिणी संपवले जातात, तर प्रभु श्रीरामाची अर्धांगिनी सीतामातेसाठी काही पद्मे असलेले रावण सैन्य, अनेक असुर आणि शिवभक्त रावण यांचा संहार करण्यात येतो. एका एका स्त्रीच्या रक्षणासाठी अवतारांनी मोठ्या प्रमाणात दुष्टांचा संहार करून जनतेला स्त्री रक्षणाचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळेच स्त्रिया सन्मानाने जगू शकल्या. पण सध्याच्या स्थितीत शिक्षेची कार्यवाहीही तात्काळ होत नाही त्यामुळे बलात्कार्‍यांना शिक्षेची जरब वाटत नाही. वर्षानुवर्षे न्यायनिवाडा चालल्यामुळे गुन्ह्याचे गांभीर्य कमी होत जाते. मधल्या काळात जामीन मिळवण्याचे प्रयत्न होतात. त्यामुळे श्रद्धा वालकर सारखी प्रकरणे वाढत आहेत. शिक्षेची अशी स्थिती असेल, तर पीडितेला न्याय मिळणे दूरच, शिक्षेची जरब लोकांमध्ये कशी बसणार ? देशात गुन्हेगारांना कायद्याचे आणि शिक्षेचे भय राहिले नसल्याने आज ही परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी आपले रक्षण कुणीतरी करेल, या भ्रमात न रहाता प्रत्येकाने स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि स्वतःचे रक्षण करण्यासाठी सिद्ध होणे ही काळाची आवश्यकता आहे.

 

३. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक पातळीवरही सक्षम करणारे स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग ! : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १६ ते ४० या वयोगटातील हिंदु समाजासाठी विनामूल्य स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकवले जाते. यामध्ये कराटे, लाठी, दंडसाखळी, तसेच प्रतिकार आणि बचाव यांची काही तंत्र शिकवली जातात. प्रशिक्षणार्थींना हिंदूंचा शौर्यशाली इतिहास आणि शौर्यजागरणाची आवश्यकता याविषयी अवगत केले जाते. त्या जोडीला आवश्यकतेनुसार ‘स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गा’चे ‘क्रॅश कोर्स’, शौर्यजागृतीपर व्याख्याने आयोजित केली जातात. या प्रशिक्षणवर्गातून केवळ शारीरिक नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरही सक्षमता साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. शरीर आणि मन यांना मर्यादा असते; पण आध्यात्मिक शक्ती ही अमर्याद असते.

 

४. उठ भगिनी जागी हो, चंडी, दुर्गा, गार्गी हो ।

उठ भगिनी जागी हो, चंडी, दुर्गा, गार्गी हो ।

अबला नको तू रणरागिणी हो, रणात लढणारी रागिणी हो । : या शौर्यगीताप्रमाणे महिलांनी सध्याच्या असुरक्षित वातावरणात टिकून राहण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. उद्याची कर्तुत्ववान आणि संस्कारक्षम पिढी घडवण्याची मोठी जबाबदारी स्त्रियांवर आहे त्यामुळेच आपल्या दैदिप्यमान इतिहासाचे स्मरण ठेवून स्त्रियांनी स्वतः मधील क्षात्रवृत्ती जागृत करून केवळ स्वतःच्या नव्हे तर राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हावे !

Copyright ©