महाराष्ट्र सामाजिक

हिंदु देवतांची टिंगल करणार्‍या वीर दास याचा कार्यक्रम मुंबईत होऊ देणार नाही !

हिंदु देवतांची टिंगल करणार्‍या वीर दास याचा कार्यक्रम मुंबईत होऊ देणार नाही !

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलीस आयुक्त यांच्याकडे तक्रार !

कोणीही उठतो आणि ‘कॉमेडी’च्या नावाखाली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावतो आणि देवतांची टिंगल करतो. यापूर्वी ‘स्टॅण्ड अप कॉमेडीयन’ मुनव्वर फारूकी होता, आता वीर दास आला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा तुम्हाला गैरवापरच करायचा आहे, तर तुम्ही मुसलमानांचे प्रेषित किंवा ख्रिस्त्यांच्या देवदूत यांच्याविषयी ‘कॉमेडी’ करून दाखवावी ! ‘सर तन से जुदा’च्या भीतीमुळे आज कोणी असे करू धजावणार नाही; मात्र हिंदु सहिष्णू असल्याने ते केवळ विरोध करतील, हे या धर्मद्रोह्यांना माहिती आहे. हिंदूंनी विरोध केला, तर हिंदूंनाच असहिष्णू ठरवले जाते. आता बस्स झालं. आम्ही आमच्या देवतांचा अपमान सहन करणार नाही. पोलिसांनी आणि आयोजकांनी जर हा कार्यक्रम रहित केला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि हा कार्यक्रम होऊ देणार नाही. हिंदुस्थानात रहायचे असेल, तर हिंदूंच्या देवतांचा आदर राखायलाच हवा, अशी भूमिका हिंदु जनजागृती समितीने घेतली आहे.

याच वीर दासचा गेल्या आठवड्यात बंगळुरु येथील कार्यक्रम हिंदु जनजागृती समितीच्या विरोधामुळे रद्द करण्यात आला होता. आता तोच कार्यक्रम मुंबईत होत आहे. या ‘कॉमेडी शो’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. 24 नोव्हेंबर या दिवशी शीव (सायन) येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेला ‘कॉमेडी शो’ रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, मा. गृहमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त आणि शीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देखील केली आहे. तसेच षण्मुखानंद सभागृहाच्या व्यवस्थापकांनाही निवेदन देऊन कार्यक्रम रहित करण्याची विनंती केली आहे.

वीर दास याने यापूर्वी त्याच्या ‘कॉमेडी शो’ मध्ये भारतीय स्त्रिया, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत यांविषयी अपमानास्पद विधाने केली आहेत. ‘सीता आणि लक्ष्मण चौदा वर्षे एकत्र जंगलात राहिले आणि ही वस्तुस्थिती आहे’, ‘लक्ष्मण जंगलात असताना 14 वर्षे झोपला नाही. तुम्ही कल्पना तरी करू शकता का, की तेव्हा सीता किती घाबरली असेल’, ‘हिंदू लोक गायीची लघवी पितात, कारण त्यांचे असे मत असते की, या लघवीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की, ते काय स्वतःला लघवीचे तज्ञ समजतात का ?’ या आणि अशा प्रकारच्या अत्यंत अश्लाघ्य भाषेत हिंदु धर्म, देवता आणि संस्कृती यांची टिंगल वीर दासने केली आहे.

अशा धर्मद्रोही वीर दासचा शो मुंबईत झाल्यास कायदा आणि सुव्यवस्था यांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मुंबईत शांतता अबाधित राखण्यासाठी हा कार्यक्रम तात्काळ रहित करावा, यांसह जाहिराती, चित्रपट, नाटके, कॉमेडी शो आदींच्या माध्यमातून होणारी देवतांची विटंबना रोखण्यासाठी ‘ईशनिंदा विरोधी कायदा’ करावा, अशी मागणीही यानिमित्ताने हिंदु जनजागृती समितीने केली आहे.

Copyright ©