अन्न व औषध प्रशासन विभागाची आढावा बैठक संपन्न,
मंत्री संजय राठोड यांनी घेतला आढावा.
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी विभागाच्या वरिष्ठ पदावरील अधिकारी यांची सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन सर्व संबंधितांना विभागातील अन्न व औषध तसेच सौदर्य प्रसाधने मध्ये गैरप्रकार करणाऱ्या विरुदध कडक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सदर बैठकीसाठी सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त, अन्न व औषध प्रशासन व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सुरवातीस औरंगाबाद विभागातील जालना, बीड व औरंगाबाद येथील भगरीच्या विष बाधेबाबत मा. मंत्री यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. राज्यातील सर्व भगर विक्री करणारे सर्व उत्पादक व सर्व विक्रेते यांच्याकडील प्रति जिल्हा दहा नमुने तपासणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या आहेत.
प्रत्येक नागरिकाच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असलेला विभाग म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभाग आहे. सकाळी घरी येणारे दुध निर्भेळ असावे, इथपासून ते दिवसभर घेतला जाणार आहार सकस आणि शुद्ध असावा, आजारपणासाठी लागणाऱ्या औषधांचा पुरवठा सुरळीत व्हावा या सर्व बाबींची काटेकोर पाहणी करणारा विभाग म्हणून अन्न व औषध प्रशासन विभाग कार्य करत असतो. या विभागाचा मंत्री म्हणून मी नुकताच कार्यभार स्विकारला आहे. या विभागामार्फत केल्या जाणाऱ्या कामाचा आवाका आणि काम करतांना भेडसावणाऱ्या समस्या याची सखोल माहिती घेतली.
औषधांच्या बाबतीतही विभागाने काटेकोर पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. बनावट आणि विनापरवाना औषध तयार करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत धाडी आणि जप्तीच्या कारवाई करुन एकुण ४१.२७ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रत्येक गरजु व्यक्तीला त्याच्या आजारपणात वाजवी दरात औषध मिळावे ही आमची प्राथमिकता आहे. काळाबाजार होऊ नये यासाठी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
औषध विभागातील सर्व कंपन्या जागतिक स्तरावरील तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करतात किंवा कसे याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. कॅन्सर, डायबेटीज बायो यावरील औषध उत्पादक कंपन्या त्यांचेकडील कर्मचारी वर्ग यांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या उपायोजना करतात. कंपनीमधील औषधाचा दर्जा हा केंद्रशासनाने नेमुन दिलेल्या संगणक प्रणाली प्रमाणे मशीनरी वापरतात काय याबाबत तपासणीच्या सुचना मा.मंत्री महोदय यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या.
अन्न विभागामध्ये भेसळ रोखण्यास कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. केंद्र शासनाने परवानगी दिलेल्या अन्न उदयोगामधील उत्पादन प्रकरणात तपासणी करता येत नाही असा मुद्दा अधिकाऱ्यांनी उपस्थित केला असता मंत्री महोदयांनी अशा सर्व पदार्थाच्या वितरक व विक्रेते यांचेकडील नमुने कायदेशीर पध्दतीने तपासण्याचे निर्देश दिले आहेत. मा. मंत्री, संजय राठोड यांनी केंद्र शासनाने अलीकडे पारीत केलेल्या अन्नपदार्थ, सर्व प्रकारचे पेये यामध्ये तपासण्या काटेकोर होतील याकडे विभागाने लक्ष देण्याचे निर्देश दिले.
राज्यामध्ये प्रतिबंधीत असलेले गुटखा व इतर पदार्थ बंदी असताना विक्री होत असल्याबाबत मा.मंत्री महोदयांनी तीव्र नाराजी व्यक्त करुन प्रतिबंधित माल येणारे आंतरराज्य सिमा, टोल नाके, गोदाम याबाबत तपासणी करुन प्रतिबंधीत मालाची वाहतुक करणारे मोठे व्यापारी वाहतुकदार यांना शोधुन कठोर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
Add Comment