अमोलकचंद महाविद्यालयात ” राष्ट्रीय मतदार जागृती दिन “
विद्या प्रसारक मंडळ यवतमाळ द्वारा संचालित अमोलकचंद महाविद्यालय यवतमाळ येथील राष्ट्रीय सेवा योजना एककातर्फे पंचवीस जानेवारीला ” राष्ट्रीय मतदार जागृती ” दिन विविध उपक्रमांद्वारे साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय सेवा योजनेचे दत्तक ग्राम नाकापार्डी येथे मतदार जागृती रॅली चे आयोजन मागील आठवड्यात केले होते. पथनाट्ये, जागर गीते व संवादातून विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांची मने जिंकली.
पंचवीस जानेवारीला महाविद्यालयात “मतदार जागर शपथ” विद्यार्थ्यांना देण्यात आली तसेच प्रासंगिक विषयाला अनुसरून ” रांगोळी लेखन ” स्पर्धेचे आयोजनदेखील करण्यात आले होते.
भारत हे लोकशाही राष्ट्र आहे आणि लोकशाहीमध्ये जे जे आपण प्रतिनिधी निवडून देतो ते प्रतिनिधी खरेच बहुमतातील असतात काय? नाही. याचे खरे कारण आहे ,आपण मतदान करण्याबाबत अनुत्साही आहोत. साठ टक्के मतदान झाले असेल तर आपण वास्तविक जनप्रतिनिधी निवडून देतच नाही. मतदार मित्रांनो, मतदान तुम्ही कोणालाही करा पण ते शंभर टक्के व्हायलाच पाहिजे . त्याकरिता आपण जागरूक व्हायला पाहिजे असे उद्गार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा यांनी नव मतदार विद्यार्थ्यांसमोर केले.
असंख्य विद्यार्थ्यांनी रांगोळ्यांचे उद्बोधनपर रेखाटन केले.
विद्याप्रसारक मंडळाचे सन्माननीय सचिव, सीए, प्रकाशजी चोपडा , गोपलानीजी, संचालक, प्राचार्य डॉ राममनोहर मिश्रा, प्राचार्य डॉ.सुप्रभा यादगीरवार, अमोलकचंद विधी महाविद्यालय, उपप्राचार्य, प्रा. विष्णू जाधव , या मान्यवरांनी रांगोळी रेखाटन करणा-या विद्यार्थ्यांची प्रशंसा केली.
प्रथम क्रमांक प्रांजली चौधरी, एम. ए. , द्वितीय क्रमांक जयश्री सोयाम , बी.कॉम. या विद्यार्थिनींनी प्राप्त केला. मान्यवरांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.
डॉ अनंतकुमार सूर्यकार, कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. माधुरी भादे, महिला कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना, प्रा. सचिन वानखेडे, सह-कार्यक्रम अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना व डॉ. मिता धुर्वे यांनी कार्यक्रमाची यशस्वीता केली.
Add Comment