यवतमाळ सामाजिक

24 जून या दिवशी वटपाैर्णिमा आहे. त्या निमित्ताने सनातन संस्थेचा लेख

 

वटपौर्णिमेचे महत्त्व, तसेच आपत्कालात हे व्रत कसे साजरे करावे ?
पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्म त्याच्या प्राप्तीसाठी हिंदू स्त्रिया वटपौर्णिमा हे व्रत करतात. वादविवादात यमाला हरवून हरण केलेले पतीचे प्राण परत मिळवणार्‍या सावित्रीच्या पातिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते. सावित्री आणि यमाचे वटवृक्षाखाली संभाषण झाल्यामुळे या दिवशी वटवृक्षाला महत्त्व प्राप्त झाले. वटवृक्ष आणि वटपौर्णिमा यांचे महत्त्व सनातन संस्थेच्या वतीने संकलित केलेल्या या लेखातून समजून घेऊया. अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी असल्याने यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. प्रस्तुत लेखात कोरोनाच्या संकटकाळातील निर्बंधांमध्येही आपत्कालात हे व्रत कसे साजरे करावे ? हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत.
> १. तिथी – वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला करतात.
२. उद्देश – सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे; म्हणून स्त्रियांनी या व्रताचा आरंभ केला.
> ३. सावित्रीचे महत्त्व – भरतखंडात प्रसिद्ध असलेल्या पतीव्रतांपैकी सावित्री हीच आदर्श मानलेली आहे. तसेच तिला अखंड सौभाग्याचे प्रतीकही मानले जाते.
> ४. व्रताची देवता – वटपौर्णिमा या व्रताची मुख्य देवता सावित्रीसह ब्रह्मदेव असून सत्यवान, नारद आणि यमधर्म या उपांग (गौण) देवता आहेत.
> ५. वटवृक्षाचे महत्त्व
यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. शास्त्रचर्चा वटवृक्षाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले.
अ. ‘प्रलय झाला तरी वटवृक्ष असतोच. तो युगान्ताचा साथीदार आहे.
आ. बाल मुकुंदाने प्रलयकाळी वटपत्रावर शयन केले.
इ. प्रयागच्या अक्षय्य वटाखाली राम, लक्ष्मण आणि सीता विसावले होते.
ई. ब्रह्मा, श्रीविष्णु, महेश, नृसिंह, नील आणि माधव यांचे वटवृक्ष हे निवासस्थान आहे.
उ. वड, पिंपळ, औदुंबर आणि शमी हे पवित्र अन् यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत. या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही पुष्कळ होतो.
ऊ. वडाच्या चिकात कापूस वाटून त्याचे अंजन डोळ्यांत घातले असता मोतीबिंदू ठीक होतो.’
ए. अक्षय अशा प्राणाचे दर्शक असणे : ‘वटसावित्रीची पूजा म्हणजे `सावित्रीच्या पातिव्रतेच्या सामर्थ्याची पूजा’; म्हणून या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते. वटवृक्ष हा अक्षय अशा प्राणाचे दर्शक आहे.’ – परात्पर गुरु पांडे महाराज
६. वटपौर्णिमा या व्रताचे महत्त्व
शिवरूपी वडाची पूजा करणे, म्हणजे त्या वडाच्या माध्यमातून शिवरूपी पतीलाच एकप्रकारे स्मरून, त्याचे आयुष्य वाढून त्याची आयुष्यातील प्रत्येक कर्माला साथ मिळावी, यासाठी ईश्वराची करूणामय भावाने पूजा करणे होय. कर्माला शिवाची जोड असेल, तर शक्ति आणि शिव यांच्या संयुक्त क्रियेने व्यवहारातील कर्म साधना बनून त्याचा जिवाला लाभ मिळण्यास साहाय्य होते; म्हणून या दिवशी वडरूपातील शिवाला स्मरून पतीला दिर्घायुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करून कर्माला शक्ति-शिव यांची जोड देऊन ब्रह्मांडातील शिवतत्त्वाचा यथायोग्य लाभ करून घ्यायचा असतो.
७. वटपौर्णिमा या व्रताच्या पूजनामध्ये पाचच फळे अर्पण करण्यामागील शास्त्र
‘कोणत्याही पूजाविधीत पाच फळे अर्पण करण्याला महत्त्व आहे. फळे ही मधुर रसाशी, म्हणजेच आपतत्त्व दर्शक असल्याने पाच फळांच्या समूच्चयाकडे आकृष्ट आणि प्रक्षेपित होणार्‍या देवतांच्या लहरी अल्प कालावधीत जिवाच्या कोषांपर्यंत झिरपू शकतात. यामुळे जिवाला देवतेच्या चैतन्य लहरींचा खोलवर आणि दीर्घकाळ लाभ मिळण्यास साहाय्य होते; कारण जिवाचा देह हाही पृथ्वी आणि आपतत्त्वात्मक आहे.’
८. वटपौर्णिमा हे व्रत करण्याची पद्धत
अ. संकल्प
प्रथम सौभाग्यवती स्त्रीने ‘मला आणि माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो’, असा संकल्प करावा.
आ. पूजन
वडाचे षोडशोपचारे पूजन करावे. पूजेत अभिषेक झाल्यानंतर वडाला सूत्रवेष्टन करावे, म्हणजे वडाच्या खोडाभोवती सुती धाग्याने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने तीनदा गुंडाळावे. पूजेच्या शेवटी ‘अखंड सौभाग्य लाभू दे, जन्मोजन्मी हाच पती लाभू दे, तसेच धनधान्य आणि कुल यांची वृद्धी होऊ दे’, अशी सावित्रीसह ब्रह्मदेवाला प्रार्थना करतात.
इ. उपवास
स्त्रियांनी संपूर्ण दिवस उपवास करावा. (अंनिसचे कार्यकर्ते ‘वटपौर्णिमा’ म्हणजे निवळ ‘भाकडकथा’ असा प्रचार करतात. कणाकणांत देवतांचे अस्तित्व मानून वृक्षदेवतेची पूजा करायला शिकवणारा महान हिंदु धर्म कुठे, तर हिंदु धर्माला असत्य ठरवणारे असे बुद्धीप्रामाण्यवादी, धर्मद्रोही आणि साम्यवादी कुठे !)
संदर्भ : सनातन संस्थेचा ग्रंथ ‘धार्मिक उत्सव आणि व्रते अन् त्यांमागील शास्त्र’

आतापर्यंत आपण वटपौर्णिमेचे समजून घेतलेले अध्यात्मशास्त्र धर्माने सर्वसाधारण काळासाठी प्रतिपादले आहे. सर्वकाही अनुकूल असून धर्माप्रमाणे वागता येईल, हा ‘संपत्काल’ होय. येथे एक महत्त्वाचे सूत्र असे आहे की, हिंदु धर्माने आपत्काळासाठी धर्माचरणात काही पर्याय सांगितले आहेत. यास ‘आपद्धर्म’ असे म्हणतात. आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म.
अजूनही कोरोनाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी असल्याने यंदाही कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनेक ठिकाणी हे व्रत नेहमीप्रमाणे साजरा करण्यास मर्यादा असू शकतात. या काळातच वटपौर्णिमा येत असल्याने संपत्कालात सांगितलेल्या काही धार्मिक कृती या वेळी करता येणार नाहीत. या दृष्टीने प्रस्तुत लेखात सध्याच्या दृष्टीने धर्माचरण म्हणून काय करता येऊ शकेल, याचा विचारही करण्यात आला आहे. येथे महत्त्वाचे सूत्र असे की, हिंदु धर्माने कोणत्या स्तरापर्यंत जाऊन मानवाचा विचार केला आहे, हे शिकायला मिळते. यातून हिंदु धर्माचे एकमेवाद्वितियत्व अधोरेखित होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्याच्या काळात आपणास फारसे घराबाहेर जाणे शक्य न झाल्यास त्या अनुषंगाने आपद्धर्माचा भाग म्हणून पुढील कृती करता येतील :
आपत्काळातील वटपौर्णिमा (वडाच्या वृक्षाचे पूजन) !
24 जून या दिवशी वटपौर्णिमा आहे. भारतात काही ठिकाणी कोरोनामुळे असलेले स्थानिक निर्बंध पाहता, स्त्रियांना वडाच्या झाडाकडे एकत्र जमून वटवृक्षाची पूजा करणे शक्य नाही. त्यामुळे काही जण वटवृक्षाची फांदी घरात आणून तिचे पूजन करतात; मात्र हे सर्वथा अयोग्य असून वृक्षपूजन करण्याच्या मूळ उद्देशालाच छेद देणारे आहे. सौभाग्यवती स्त्रीने घराबाहेर न पडता घरात पुढीलप्रमाणे पूजन करावे :
१. पाट किंवा चौरंग यांना प्रदक्षिणा घालता येईल, अशा रितीने पाट किंवा चौरंग पूर्व-पश्‍चिम ठेवावा.
२. पाट किंवा चौरंग यांवर गंधाने वटवृक्षाचे रेखाचित्र काढावे.
३. आपण प्रत्यक्ष वटवृक्षाखाली बसलो आहोत, असा भाव ठेवून त्याचे विधिवत् पूजन करावे.
४. आपण प्रत्यक्ष वटवृक्षालाच प्रदक्षिणा घालत आहोत, हा भाव ठेवून या पाटाला प्रदक्षिणा घालत सूताचे वेष्टन करावे (दोरा गुंडाळावा) आणि पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी प्रार्थना करावी.
५. शहरात ʻफ्लॅटʼमध्ये रहाणार्‍या व्यक्तींना घरात पुरेशी जागा उपलब्ध नसल्यास त्यांनी पूजनानंतर प्रार्थना करून पाट बाजूला ठेवला तरी चालेल.

Copyright ©