यवतमाळ सामाजिक

‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल माफी कधी मागणार? – हिंदु जनजागृती समिती

यवतमाळ – योगऋषि रामदेवबाबा यांच्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे; मात्र आयुर्वेदावर सातत्याने टीका करणारे, कोरोना काळातही ख्रिस्ती धर्मांतराचा अजेंडा राबवणारे ‘इंडीयन मेडीकल असोसिएशन (IMA)’चे विद्यमान अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टीन जयलाल हे भारतीयांची माफी केव्हा मागणार आहेत ? आम्ही ‘अ‍ॅलोपॅथी’च्या विरोधात नाही; तसेच ‘इंडीयन मेडीकल असोसिएशन’च्या विरोधात तर नाहीच नाही; मात्र डॉ. जयलाल यांच्या हिंदुविरोधी आणि ख्रिस्ती धर्मांतराला पूरक भूमिका घेण्याच्या विरोधात नक्कीच आहोत. डॉ. जयलाल यांनी एका मुलाखतीत कोरोना संसर्गाचा प्रकोप कमी होत चालला आहे, याचे श्रेय वैद्यकीय सुविधा, डॉक्टर्स, कोविड योद्धे यांना न देता जीझसला दिले. हा कोरोना संसर्गात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणार्‍या सर्वांचाच अपमान आहे. या प्रकरणी डॉ. जयलाल यांनी माफी मागायलाच हवी अन्यथा स्वतःला ‘ख्रिस्ती धर्मप्रसारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. तसेच डॉ. जयलाल यांनी माफी न मागितल्यास केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी डॉ. जयलाल यांना माफी मागण्यास भाग पाडावे, असे आवाहनही समितीने केले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबर 2020 मध्ये अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यावर डॉ. जयलाल यांची ‘ख्रिश्‍चॅनिटी टुडे’ला दिलेली मुलाखत 30 मार्च 2021 या दिवशी प्रकाशित झाली आहे. या मुलाखतीमध्ये अनेक धक्कादायक वक्तव्ये केली आहेत. यातून ते मेडिकलचे विद्यार्थी, डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्याकडे धर्मांतरणाची संधी म्हणूनच पहात असल्याचे दिसून येते. ते म्हणतात की, जीझस ख्राइस्टचे प्रेम सर्वांना द्या आणि ‘जीझसच तुमचे रक्षण करेल’ असा विश्‍वास सर्वांना द्या ! चर्च आणि ख्रिस्ती दयाभाव यांमुळेच जगातील पूर्वी येऊन गेलेल्या अनेक महामारी आणि रोगांवर इलाज मिळाला होता ! त्यांनी IMA च्या अध्यक्षीय भाषणात तर ‘सर्वशक्तीमान ईश्‍वर हा जीझस ख्राइस्टने दिलेली भेट आहे आणि उद्या जे होईल, ती पण त्याचीच भेट असेल’ असे म्हटले होते. अन्य एका मुलाखतीत ते म्हणाले की, वैश्‍विक महामारी पसरली असूनही ख्रिस्ती धर्म वाढतच चालला आहे. या वक्तव्यातून ख्रिस्ती धर्मांतराला त्यांचे समर्थन स्पष्ट दिसून येते. याच प्रकारे त्यांनी ‘Haggai इंटरनॅशनल’ला देखील मुलाखत दिली होती.

या मुलाखतीत आयुर्वेदावर आणि केंद्र सरकारवर टीका करतांना डॉ. जयलाल म्हणतात की, मोदी सरकारची सांस्कृतिक मूल्ये आणि पारंपारिक आस्था हिंदुत्वावर आधारित आहेत, म्हणून मोदी सरकार आयुर्वेदावर विश्‍वास ठेवते. आयुर्वेदाचे मूळ संस्कृतमध्ये आहे आणि संस्कृत ही हिंदुत्वाची भाषा आहे. अशी वक्तव्ये करून डॉ. जयलाल यांनी त्यांचा हिंदुत्वद्वेष आणि संस्कृतद्वेषच दाखवला आहे. अशा धार्मिक द्वेष बाळगणार्‍या व्यक्तीला लोकशाही देशातील इतक्या मोठ्या संस्थेच्या अध्यक्षपदी रहाण्याचा काहीएक अधिकार नाही. ‘आयएमए’मधील सर्व डॉक्टरांना समिती आवाहन करत आहे की, ख्रिस्ती धर्मप्रसारक डॉ. जयलाल यांना अध्यक्षपदावरून त्वरित हटवून धर्मांतराचे षड्यंत्र उलथवून लावा.

Copyright ©