यवतमाळ

588 जण कोरोनामुक्त ; पाच हजारांच्या वर रिपोर्ट निगेटिव्ह 17 मृत्युसह 1075 जण पॉझेटिव्ह

 

यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण तसेच मृत्युच्या संख्येत वाढ होत असली तरी एकाच दिवसांत बरे होण्याचे प्रमाण आणि दिवसभरातील एकूण रिपोर्टपैकी निगेटिव्ह रिपोर्ट येण्याचे प्रमाणसुध्दा लक्षणीय आहे. रविवारी 588 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर एकाच दिवशी 5279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

जि.प. आरोग्य विभागाच्यातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 6354 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 1075 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5279 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 5839 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2692 तर गृह विलगीकरणात 3147 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 40647 झाली आहे. 24 तासात 588 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 33922 आहे. तर जिल्ह्यात एकूण 886 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 11.79 असून मृत्युदर 2.18 आहे.

गत 24 तासात जिल्ह्यात एकूण 17 मृत्यु झाले असून यातील 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर तीन मृत्यु खाजगी रुग्णालयात झाले आहे. एकूण 17 मृतांपैकी एक मृत्यु यवतमाळ जिल्ह्याबाहेरील आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील 55, 65, 73 वर्षीय पुरुष आणि 45, 65, 70 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 60, 65, 73 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 47 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 45 वर्षीय महिला, कळंब तालुक्यातील 62 वर्षीय महिला, झरी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर खाजगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये दिग्रस येथील 35 वर्षीय पुरुष, बाभुळगाव तालुक्यातील 41 वर्षीय पुरुष आणि अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील 65 वर्षीय पुरुष आहे.

रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 1075 जणांमध्ये 682 पुरुष आणि 393 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 260 पॉझेटिव्ह रुग्ण, उमरखेड 197, पांढरकवडा 175, पुसद 109, दारव्हा 64, दिग्रस 61, वणी 29, मारेगाव 28, बाभुळगाव 26, नेर 26, आर्णि 22, कळंब 20, महागाव 18, नेर 18, घाटंजी 12 आणि इतर शहरातील 10 रुग्ण आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 344722 नमुने पाठविले असून यापैकी 341673 प्राप्त तर 3049 अप्राप्त आहेत. तसेच 301026 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जिल्ह्यातील रुग्णालयात असलेल्या बेडची उपलब्धता : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 557 बेड रुग्णांसाठी उपयोगात तर 20 बेड शिल्लक आहेत. विशेष म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयातील 410 ऑक्सीजन बेडपैकी 340 जणांना ऑक्सीजनची आवश्यकता आहे. मात्र उर्वरीत 70 रुग्ण ऑक्सीजन बेडवर भरती असले तरी त्यांना ऑक्सीजनची आवश्यकता नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दारव्हा, पुसद आणि पांढरकवडा या तीन डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये एकूण 180 बेडपैकी 83 रुग्णांसाठी उपयोगात, 97 बेड शिल्लक, जिल्ह्यातील 28 कोव्हीड केअर सेंटरमध्ये एकूण 2278 बेडपैकी 1545 उपयोगात तर 733 शिल्लक आणि 20 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 729 बेडपैकी 536 उपयोगात तर 193 बेड शिल्लक आहेत.

काही बाबी वगळता जीवनावश्यक दुकानांची वेळ

आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत

यवतमाळ, दि. 18 : राज्यात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजतापासून 1 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. तसेच सदर कालावधीत कलम 144 (संचारबंदी) लागू करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात संचारबंदीच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा ही सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अत्यावश्यक सेवेतील काही बाबी वगळता इतर अत्यावश्यक दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता या दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत राहील.

यवतमाळ जिल्ह्यातील सर्व प्रकारची जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा अंतर्गत असलेली आस्थापना / दुकाने (सर्व प्रकारची रुग्णालये, डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनीक, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधी दुकाने व औषधी कंपन्या, औषधी व आरोग्य सेवा व औषध निर्मिती करणारे कारखाने तसेच त्यांचे वितरण, वाहतूक व्यवस्था, लस, मास्क, सॅनिटायझर, वैद्यकीय उपकरणे व तत्सम बाबी, कच्चा माल युनीट आणि त्या संबंधित सेवा इत्यादी, पशुवैद्यकीय दवाखाने व त्यांची औषधीची दुकाने, पेट्रोलपंप व पेट्रोलियम संबंधित उत्पादने, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम, टपालसेवा केंद्र वगळता) ही संचारबंदीच्या कालावधीत दि. 30 एप्रिल 2021 पर्यंत यापुढे सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे.

तसेच सर्व प्रकारची खानावळ, हॉटेल व उपहारगृहामधून पुरविण्यात येणारी पार्सल सेवा, दुध संकलन केंद्र, दुधाचे घरपोच वितरण सेवा या बाबी सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत सुरू राहतील. शासकीय कार्यालये, परवानगी असलेले खाजगी कार्यालये, बँका या त्यांच्या कार्यालयीन वेळेनुसार सुरू राहतील.

सदर आदेश 19 एप्रिल 2021 च्या सकाळी 7 वाजतापासून 1 मे 2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत यवतमाळ शहर व जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहणार आहे. वरील आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिताच्या कलम 188 व इतर संबंधित कायदे व नियम यांच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

Copyright ©