लग्नसमारंभात गर्दी–२० हजार रुपये दंडाची आकारणी.
उपविभागीय अधिकारी मोहिते यांच्या आदेशावरून कारवाईतालुक्यातील मौजे कानडी येथे लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यामुळे २०००० /- रु.दंड उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार आकारण्यात आला. कोरोना महामारी च्या संदर्भात राज्य शासनाकडून वेळोवेळी विविध आदेश पारित करण्यात येत असून महामारी आटोक्यात आणण्याकरता आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत.तरी देखील लोकांमध्ये अद्यापही या महामारी बाबत म्हणावी तशी जागृतता आली नाही की काय असेच वाटते. संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातले असून अनेकांचे प्राण देखील या महामारीच्या विळख्यात जात आहेत. सदर महामारी आटोक्यात आणण्याकरता गर्दी टाळणे,सुरक्षित अंतर आणि तोंडावर मास्क या तीन महत्त्वपूर्ण बाबी अंगीकारून लवकरात लवकर या संकटावर मात करणे शक्य आहे. परंतु सद्यस्थितीत लग्न समारंभामध्ये चिक्कार गर्दी होत असून घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. मुर्तीजापुर शहरात देखील हीच परिस्थिती दिसून येत आहे. तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कानडी बाजार येथे आज लग्न समारंभ होता. त्या ठिकाणी ५० पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्याने उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांच्या आदेशावरून पिंजर पोलिसांच्या मदतीने सदर कारवाई मंडळ अधिकारी महेश नागोलकर तलाठी,आर.एम.ढोरे,सचिव जि.पी.जाधव यांनी केली.
Add Comment