यवतमाळ

पाच मृत्युसह 439 जण पॉझेटिव्ह 321 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 25 : गत 24 तासात जिल्ह्यात पाच मृत्युसह 439 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 321 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 80 वर्षीय पुरुष, 68 आणि 64 वर्षीय महिला, दिग्रस येथील 65 वर्षीय पुरुष आणि दारव्हा तालुक्यातील 52 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच आज (दि.25) पॉजिटिव आलेल्या 439 जणांमध्ये 318 पुरुष आणि 121 महिला आहेत. यात यवतमाळातील 139, दिग्रस 85, पुसद 52, उमरखेड 40, आर्णि 26, पांढरकवडा 23, नेर 15, महागाव 14, घाटंजी 12, वणी 12 बाभुळगाव 7, मारेगाव 5, दारव्हा 3, कळंब 2, झरीजामणी 2 आणि इतर शहरातील 2 रुग्ण आहे.

गुरुवारी एकूण 5324 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 439 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4885 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2524 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 26275 झाली आहे. 24 तासात 321 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 23155 आहे. तर जिल्ह्यात एकूण 596 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 248646 नमुने पाठविले असून यापैकी 239182 प्राप्त तर 9664 अप्राप्त आहेत. तसेच 212707 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

 

जिल्ह्यातील 16 रेतीघाटांचा 22 कोटींमध्ये लिलाव

89952 ब्रास रेतीसाठा मंजूर

यवतमाळ, दि. 25 : जिल्ह्यातील 16 रेतीघाटांचा लिलाव करण्यात आला असून यासाठी सर्वोच्च बोली एकूण 22 कोटी 82 लाख 57 हजार 064 रुपये लावण्यात आली आहे. विशेष म्हणजे सन 2019 – 20 मध्ये या सर्व रेतीघाटासाठी निश्चित केलेली सरकारी रक्कम 14 कोटी 3 लाख 93 हजार रुपये होती. निश्चित केलेल्या दरापेक्षा 8 कोटी 78 लाख रुपये या माध्यमातून शासनाकडे अतिरिक्त जमा होणार आहे.

बाभुळगाव तालुक्यातील भैयापूर रेतीघाटाची सर्वोच्च बोली 87 लाख 68 हजार 500 रुपये, नागरगाव रेतीघाट 53 लाख 53 हजार 500 रुपये, आर्णि तालुक्यातील साकूर – 1 रेतीघाटासाठी 1 कोटी 25 लाख 95 हजार 555 रुपये, साकूर – 2 रेतीघाटासाठी 1 कोटी 11 लाख 87 हजार 972 रुपये, राणीधानोरा – 2 रेतीघाटासाठी 3 कोटी 1 लाख 83 हजार रुपये, राळेगाव तालुक्यातील जागजाई रेतीघाट 2 कोटी 25 लाख रुपये, रोहिणी – 2 रेतीघाटासाठी 2 कोटी 87 हजार 14 लाख 141 रुपये, घाटंजी तालुक्यातील विलायता रेतीघाट 89 लाख 5 हजार रुपये, माणूसधारी रेतीघाटासाठी 2 कोटी 3 लाख 5 हजार 555 रुपये, वणी तालुक्यातील सुर्जापूर रेतीघाट 29 लाख 50 हजार रुपये, भुरकी – 1 रेतीघाटासाठी 1 कोटी 99 लाख 96 हजार 786 रुपये, उमरखेड तालुक्यातील साखरा रेतीघाट 90 लाख 500 रुपये, चालगणी रेतीघाट 1 कोटी 71 लाख 95 हजार 555 रुपये, कळंब तालुक्यातील औरंगपूर रेतीघाट 55 लाख 68 हजार 500 रुपये, मारेगाव तालुक्यातील आपटी उत्तर रेतीघाट 1 कोटी 39 लाख 32 हजार 500 रुपये आणि महागाव तालुक्यातील थार खुर्द रेतीघाटासाठी सर्वोच्च बोली 1 कोटी 11 लाख रुपये लावण्यात आली आहे.

विशेष म्हणजे लिलाव झालेल्या रेतीघाटावर सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंतच रेतीची उचल करता येईल. सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कोणतेही वाहन किंवा कामगारांनी रेतीघाटावर प्रवेश केल्यास कलम 144 नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Copyright ©