यवतमाळ

जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण पॉझेटिव्ह 286 जण कोरोनामुक्त

 

 

यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात 10 मृत्युसह 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 286 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील 75, 78, 62, 71 वर्षीय पुरुष आणि 60, 65 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिला, दिग्रस येथील 52 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 62 वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील 65 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.23) पॉजिटिव आलेल्या 556 जणांमध्ये 393 पुरुष आणि 163 महिला आहेत. यात यवतमाळातील 234, राळेगाव 59, दारव्हा 53, उमरखेड 40, दिग्रस 39, पांढरकवडा 39, पुसद 29, कळंब 23, नेर 13, वणी 6, बाभुळगाव 6, घाटंजी 5, आर्णि 3, मारेगाव 2, झरीजामणी 2 आणि 3 इतर शहरातील रुग्ण आहे.

मंगळवारी एकूण 5404 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 556 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 4848 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 2225 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 25396 झाली आहे. 24 तासात 286 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 22588 आहे. तर जिल्ह्यात एकूण 583 मृत्युची नोंद आहे.

सुरवातीपासून आतापर्यंत 239703 नमुने पाठविले असून यापैकी 228470 प्राप्त तर 11233 अप्राप्त आहेत. तसेच 203074 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

 

महिला व बालभवन तसेच कोरोनाचा आढावा

यवतमाळ, दि. 23 : जिल्ह्यात झरीजामणी, पांढरकवडा, मारेगाव तसेच इतर आदिवासी बहुल भागातील कुमारी मातांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ब-याच वर्षांपासून प्रलंबित आहे. या महिलांना विविध योजनेतून लाभ देऊन सामाजिक, आर्थिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी त्यांचे रोजगाराभिमुख पुनर्वसन करावे, अशा सुचना महिला व बालविकास मंत्री ॲङ यशोमती ठाकूर यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालभवन तसेच कुमारी मातांच्या पुनर्वसनासंदर्भात आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. रंजन वानखेडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, उपाध्यक्ष संजय देरकर, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख आदी उपस्थित होते.

कुमारी मातांना बालसंगोपन योजना, मनोधैर्य योजना तसेच महिला बचत गटाकडून विविध योजनांचा लाभ मिळाल्यानंतर त्यांच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीत बदल झाले का, असे विचारून ॲङ ठाकूर म्हणाल्या, या मातांना स्थानिक स्तरावरच रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. 2014 पासून हा प्रश्न प्रलंबित आहे. यावर अतिशय संथगतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यामुळे भविष्यात हा प्रश्न त्वरीत निकाली काढावा. रोजगाराभिमुख उपक्रम राबविण्यासाठी नाविण्यपूर्ण योजना, महिला व बालविकास, एकात्मिक आदिवासी विकास, महिला आर्थिक महामंडळ, कौशल्य विकास, जिल्हा नियोजन समिती आदी विभागाची मदत घ्या. मानसिक व सामाजिकदृष्टया कुमारी मातांना सक्षम बनविणे आवश्यक झाले आहे. दीर्घकालीन उपाययोजना आखून भविष्यात योग्य अंमलबजावणी व्हावी, या दृष्टीने अधिका-यांनी नियोजन करावे, अशाही सुचना त्यांनी दिल्या.

जिल्ह्यात महिला व बालभवनासाठी पाच कोटींची तरतूद करण्यात आली असली तरी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये उपलब्ध झाले आहे. त्यामुळे इमारतीचे उत्कृष्ट डिझाईन तयार करून सर्व सोईसुविधायुक्त इमारत उभी करा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्या हस्ते ‘अंगणवाडीतील अंगणात’ आणि जि.प.महिला व बालकल्याण विभागाने तयार केलेल्या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले. तसेच त्यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावासुध्दा घेतला.

जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कुमारी मातांच्या संदर्भात सादरीकरण केले. जिल्ह्यात एकूण 91 कुमारी माता असून सर्वाधिक झरीजामणी (30) मध्ये आहे. सर्व महिला ह्या 18 वर्षांवरील असून त्यांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांकरीता जिल्ह्यात नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर सामाजिक न्या भवनाच्या धर्तीवर जिल्ह्यात महिला व बालभवन तयार करण्यात येईल. यात हिरकणी कक्ष, अभ्यांगत कक्ष, महिला बचत गटासाठी कक्ष, मिटींग सभागृह आदींची निर्मिती करण्यात येईल, असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले

 

 

Copyright ©