राज्य सरकारचा तीन लाखपर्यन्त बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय स्वागतार्ह
दहा लाखपर्यन्तचा निर्णय केन्द्र सरकारने घ्यावा- किशोर तिवारी
प्रतिनिधी यवतमाळ
महाराष्ट्रातील आघाडी सरकारने शेतक-यांना तीन लाखापर्यन्तचे बिनव्याजी पिककर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी स्वागत केले आहे. विशेष म्हणजे अशाच पध्दतीने केन्द्र सरकारने सुध्दा तीन लाखाच्या समोरील दहा लाखापर्यन्त बिनव्याजी कर्ज देण्यासंदर्भात योजना घोषीत करण्याची मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
राज्यातील उध्दव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय. कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय शेतक-यांना दिलासा देणारा ठरणार आहे. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत आता तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीककर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांनाही तातडीने लाभ देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचा निर्णय राज्यातील आघाडी सरकारनं घेतलाय. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी बैठक झाली. त्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत एक लाखापर्यंतचे कर्ज बिनव्याजी तर तीन लाखांपर्यंतचे कर्ज दोन टक्के व्याजाने दिले जाते. मात्र, यंदाच्या खरीप हंगामासाठी तीन लाखांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी देण्यात येणार असल्याचं ठाकरे सरकारनं सांगितलंय.
केन्द्र सरकारने निर्णय घ्यावा
शेतक-यांना राज्य सरकारने तीन लाख पर्यन्तचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. केन्द्र सरकारने सुध्दा शेतक-यांना मातीत घालणारे निर्णय न घेता अशा पध्दतीने शेतक-यांना दिलासा देणारे निर्णय घ्यायला हवे. राज्य सरकारप्रमाणेच आता केन्द्र सरकारने सुध्दा दहा लाख पर्यन्त बिनव्याजी पिककर्ज उपलब्ध करुन देण्यासंदर्भात योजना आनल्यास शेतक-यांना दिलासा मिळेल असेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
Add Comment