सामाजिक

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभा’

 

हिंदु जनजागृती समिती हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी अविरतपणे कार्यरत आहे. धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदूसंघटन ही समितीच्या कार्याची पंचसूत्री आहे. यासाठी समितीच्या वतीने अधिवेशने, धर्मशिक्षणवर्ग, व्याख्याने, आंदोलने, सभा आदी उपक्रम राबवले जातात. हिंदु राष्ट्र जागृती सभा हा समितीच्या उपक्रमांमागील मैलाचा दगड म्हणता येईल. समितीच्या वतीने देशभरात आतापर्यंत १८९६ सभा घेण्यात आल्या असून त्या माध्यमातून धर्मचरणी हिंदूंचे कृतीशील संघटन निर्माण होत आहे. या सभांमधून सर्वप्रथम दिला गेलेला धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेचा नारा आता देशव्यापी झाला आहे. हाच नारा बुलंद करण्यासाठी समितीच्या वतीने ‘ऑनलाईन हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे’ आयोजन करण्यात आले आहे. कोरोनामुळे उद्भवलेली प्रतिकुल परिस्थिती समितीच्या धर्मप्रसाराच्या कार्याला अटकाव घालू शकली नाही. उलट समितीने या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे चालूच ठेवले. आताही दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष सभा घेण्यास मर्यादा असल्याने समितीच्या वतीने ‘ऑनलाईन’ माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.
हिंदु राष्ट्र-जागृती सभांची आवश्यकता
वास्तविक सनातन हिंदु धर्म हा भारताचा आत्मा आहे. जेव्हा देशात धर्माला प्रतिष्ठा होती, तेव्हा भारत वैभवाच्या शिखरावर होता; पण मोगल, इंग्रज आदी परकीय आक्रमकांनी भारताचे बलस्थान ओळखून हिंदु धर्मावर घाला घालून भारतियांची सनातन धर्माशी असलेली नाळ कशी तुटेल, हे पाहिले. स्वातंत्र्योत्तर काळात खरे तर देशातील बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक श्रद्धा, आस्था, धर्म-परंपरा यांचे रक्षण व्हायला हवे होते; पण दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट भारताच्या राज्यघटनेत असंवैधानिक पद्धतीने ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द घुसडण्यात आले. हिंदूंच्या धर्मभावना कधी ठोकरण्यात आल्या, तर कधी त्याचा राजकीय वापर करण्यात आला. आता हे चित्र पालटण्याची वेळ आली आहे. त्यासाठीच या हिंदु राष्ट्र जागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. भारत हे हिंदु राष्ट्र उद्घोषित करण्यासाठी सामान्य हिंदू, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संप्रदाय यांना एकत्र करणे, हाच या धर्मजागृती सभांचा प्रमुख हेतू आहे.
आजही देशात ‘लव्ह जिहाद’च्या घटना घडत आहेत, दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात मंदिरांच्या तोडफोडीच्या, तसेच धर्मांतराच्या घटना घडत आहेत, चित्रपट-वेबसिरीज या माध्यमातून हिंदूंच्या देवतांचे अश्‍लाघ्य विडंबन केले जात आहे, शत्रूराष्ट्रांकडून भारतातील त्यांच्या छुप्या हस्तकांच्या माध्यमातून भारतद्वेष पसरवला जात आहे. अशा घटनांना आळा घालायचा असेल, तर विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. राममंदिरासह रामराज्य प्रत्यक्ष अवतरित करण्यासाठी भगिरथ प्रयत्न करणे, हे हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे. त्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आवर्जुन उपस्थित राहून या कार्यात योगदान द्या !

Copyright ©