Breaking News यवतमाळ सामाजिक

सुरक्षात्मक अग्निशमन यंत्रणा बसवून फायर ऑडीट* *करण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना* __________ *जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 नव्याने पॉझेटिव्ह* *48 जण कोरोनामुक्त*

 

 

 

 

यवतमाळ, दि. 10 : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे दहा नवजात बालकांचा दुर्देवी मृत्यु झाला. या पार्श्वभुमीवर यवतमाळ जिल्ह्यात भविष्यात कोणतीही अघटीत घटना घडू नये, म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी याबाबत जिल्ह्यातील सार्वजनिक वापराच्या व वर्दळ असणा-या ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक अग्निशमन यंत्रणा तातडीने बसवून वेळोवेळी त्याचे फायर ऑडीट करण्याच्या सुचना दिल्या आहे.

 

नगर विकास विभागाच्या 22 व 25 जून 2012 च्या शासन परिपत्रकानुसार तसेच महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमीचे संचालक यांच्या 30 सप्टेंबर व 16 ऑक्टोबर 2015 च्या पत्रानुसार जिल्ह्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्था व विशेष नियोजन प्राधिकरणे यांच्या कार्यक्षेत्रातील सार्वजनिक वापराच्या व लोकांची वर्दळ असणा-या शासकीय / निमशासकीय इमारतींचे जसे की, सिनेमा हॉल्स, नाट्यगृहे, रुग्णालये, शैक्षणिक, वाणिज्यिक / व्यापारी संकूले, मॉल्स, सुपर बाजार, तारांकित हॉटेल्स, मोठी व्यावसायिक कार्यालये, निमशाकीय हॉस्पीटल, औद्योगिक क्षेत्र इत्यादी ठिकाणी सुरक्षात्मक अग्निशमन यंत्रणा बसवून त्याबाबतचे वेळोवेळी परिक्षण (फायर ऑडीट) करणे बंधनकारक असल्याच्या सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगर पालिका जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्ह्यातील सर्व नगर पालिका / नगर पंचायतयींचे मुख्याधिकारी, जिल्हा अग्निशमन अधिकारी यांनी शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्राधान्याने योग्य कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही जिल्हाधिका-यांनी आदेशात म्हटले आहे.

________________________________

*जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 नव्याने पॉझेटिव्ह*

 

48 जण कोरोनामुक्त

 

यवतमाळ, दि. 10 : नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शासन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 48 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 58 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 60 वर्षीय आणि पांढरकवडा तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 10) एकूण 480 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 74 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 406 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 449 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13201 झाली आहे. 24 तासात 48 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12342 आहे. तर जिल्ह्यात एकूण 410 मृत्युची नोंद आहे.

 

सुरवातीपासून आतापर्यंत 129066 नमुने पाठविले असून यापैकी 128275 प्राप्त तर 791 अप्राप्त आहेत. तसेच 115074 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

Copyright ©